अपरिचित ऐतिहासिक ठेवा (Unknown Historical Gems of Maharashtra)

बरेच दिवस झाले माझी कुठे भटकंती नाही झाली , त्यामुळे नवीन असे काही पाहण्यात आलेले लिहिण्यासारखे नव्हते मग म्हंटलं चला जे पाहून झालं आहे आणि लिहायचे बाकी आहे ते लिहुयात….

खर तर ब्लॉग चे नाव वाचल्यावर तुम्हाला कळले असेलच कि ह्या वास्तू अपरिचित आणि जिथे राबता कमी आहे अश्याच असणार.खरं तर आता माझ्यासारखा भटका इतिहासप्रेमी म्हणा किंवा काही संशोधकांमुळे म्हणा  हि ठिकाणे नावारूपास येत आहेत.मी ३ वास्तूंबद्दल लिहिणार आहे आणि इथून पुढे अजून अपरिचित वास्तू पाहिल्यावर वेगवेगळ्या भागांत त्यांची माहिती समोर आणेल. 
१. लोनाड लेणी (कल्याण)- कल्याण हे ऐतिहासिक ठिकाण आहे हे सर्वश्रुत आहे परंतु ते फक्त प्रामुख्याने दुर्गाडी किल्ला आणि शिवरायांचे आरमार ह्यामुळे जाणले जाते अर्थात ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत.पण ह्याच कल्याण मध्ये लोनाड गाव आहे आणि ह्या गावात लेणी आहेत हे मात्र फार कमी जणांना माहित आहे.कल्याण पासून ९ किलोमीटर वर आपण पडघा नाशिक कडे जाताना गांधारी -बापगाव  असे करत  मुंबई-नाशिक महामार्गावर जेव्हा येतो तेव्हा डावीकडेच रस्त्या लगत एक छोटे टेकाड लागते त्या टेकाडावर ह्या लेणी आहेत. गावातून पण रस्ता आहे मात्र त्या मार्गाने पहिल्यांदा जाऊ नये.गावकरी मात्र ह्या लेण्यांना लेणी म्हणून ओळखत नाहीत तर देवीचे मंदिर म्हणून ओळखतात. ह्या लेण्या इ .स पूर्व ५ व्या ते ८व्या शतकातील असाव्यात व लेण्यांचा प्रकार बौद्ध लेणी तसेच थोड्या फार प्रमाणात हिंदू लेण्यांमध्ये पडतो . लेण्यांच्या परिसरात पोहोचल्यावर ३ खांब , दोन प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावन दिसते.

एक खांब तुटलेल्या अवस्थेत आहे . खांबांच्या डाव्या बाजूला एक खोदीव टाके आहे आणि उजव्या बाजूला भग्नावस्थेतील मुर्त्या कोरल्या आहेत.बहुधा बुद्ध आणि त्यांचे अनुयायी ह्यात कोरले असावे .आत गेल्यावर छोटेखानी चैत्यगृह आहे त्यातला काही भाग हा अपूर्ण कोरलेला आहे. सध्या चैत्यगृहात देवीच्या शेंदूर फासलेल्या २ मुर्त्या आणि शेंदूर फासलेल्या गणेशाची मूर्ती आहे. बाकी काही अवशेष नाहीत. 

२. शिवकालीन अथवा पेशवेकालीन विहीर (देवळाली गाव , बदलापूर)-  साताऱ्यातील बारा मोटांची विहीर तशी प्रसिद्धच आहे , पण अशीच एक छोटेखानी  ऐतिहासिक विहीर तीही मुंबई-ठाणे पासून जवळ आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल.कल्याणच्या पुढील बदलापूर पासून ७ किलोमीटर अंतरावरील देवळाली गावात एका घराच्या मागे हि विहीर तिच्या विशिष्ट शिवपिंडीचा आकार म्हणा किंवा चावीच्या  आकारामुळे म्हणा लक्ष वेधून घेते. दुचाकी वाहनाने किंवा ऑटोरिक्षाने आपण बदलापूर रेल्वे स्टेशन हुन देवळाली गावात पोहोचू शकतो. गावात पोहोचल्यावर देवळाली असा फलक लावला आहे तिथून मोजून १५ ते २० पावलांवर एक घर लागते त्या घराच्या मागे हि विहीर आहे. विहिरीच्या आत आपण पायऱ्यांनी उतरू शकतो. 

विहिरीत उतरल्यावर डाव्या बाजूला २ कोनाडे आहेत समोरच वरती मध्यभागी गणेश कोरला आहे आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मुर्त्या कोरल्या आहेत ज्यातील एकाच्या हातात क्षस्त्र आहे. गणेशाच्या मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. गणेश मूर्ती खाली कोरीव कमान आहे. कमानीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कमलशिल्प कोरले आहे.विहीर खूप खोल आहे आणि बारा महिने अगदी दुष्काळ असला तरी ह्या विहिरीतले पाणी आटत नाही असे गावकरी म्हणतात.

दुर्दैवाने ह्या विहिरीचा इतिहास परिचित नाही आहे म्हणूनच मी वरती शिवकालीन अथवा पेशवेकालीन म्हंटले आहे. देवळाली गाव पूर्वी घाटमाथ्यावर लक्ष ठेवणाऱ्या मार्गात यायचे , आणि शिवाजी महाराज व यांचे सैनिक बदलापुरात घोडे बदलायचे असे म्हंटले जाते त्यामुळे ह्या विहिरीचा वापर त्या दरम्यान केला गेला असावा असे वाटते. तूर्तास आपण ह्यात न पडता हा सुंदर ठेवा व त्याचे वैविध्य  जतन करूयात.
(टीप :शक्यतो गावात संध्याकाळी ७ च्या आत जावे कारण येण्या जाण्यासाठी ऑटोरीकक्षेची सोय कमी आहे.)

३.गिरणारे गावातील विहीर- आपण नुकतीच वरती शिवकाळात असणाऱ्या विहिरीची माहिती वाचली , आताआपण अशीच एक वेगळ्या धाटणीतील विहीर पाहू. नाशिक पासून २० किलोमीटर अंतरावरील गिरणारे गावात हि विहीर आहे. हि विहीर देवी अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे असे गावात फलक लावला आहे.
विहिरीचे बांधकाम बघून चटकन लक्षात येते कि हिचे बांधकाम होळकरांच्या काळातील म्हणजे १७ व्या शतकातल्या उत्तरार्धातील आहे. विहीर अजून पण तत्कालीन लाल विटांमध्ये आपणास पाहायला मिळते , डुबेरे गावातील बर्व्यांचा वाडा सुद्धा अशाच विटांमध्ये बांधल्याचा दिसतो.ह्या विहिरीची पण खोली खूप आहे.विहिरीत आपण पायऱ्यांनी उतरू शकतो

उतरल्यावर दोन्ही बाजूस कोनाडे आहेत आणि समोर सुंदर कमान कोरली आहे आणि कमानी च्या  समोर पण कोनाडा कोरला आहे. उतरून डाव्या बाजूस गेल्यावर आपल्याला मुख्य विहीर लागते.नाशिक जवळील रामशेज किल्ला आणि हि विहीर एका दिवसात पाहता येते. रामशेज ते गिरणारे अंतर ३४ किमी चे आहे.   

Leave a comment