कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)

मागील भागात मी कोल्हापूर रेंज मधल्या रांगणा व भुदरगड विषयी सांगितले आता पुढे जाऊयात सामानगडाकडे. भुदरगडाहून सामानगड ४४ किलोमीटर वर आहे.गडहिंग्लज मार्गे चिंचेवाडी गाठून मग

सामानगडावर जाता येते.किल्ल्याचा आवाका बघता आणि किल्ल्यावर असणाऱ्या पाण्याच्या आणि धान्य दारुगोळा साठवण्याच्या क्षमतेवरून किल्ल्याचे नाव योग्य वाटते.मी तर ह्या किल्ल्याला विहिरींचा गडचं म्हणेल,कारण किल्ल्यावर अप्रतिम अशा मोठमोठ्या विहिरी आहेत.असो, स्वतःच्या वाहनाने आपण किल्ल्यावर गाडीरस्त्याने पोहोचू शकतो.किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजहि शाबूत आहेत,तेही इंग्रजांनी गडाची नासधूस करून सुद्धा.किल्ला बघण्यासाठी सरळ चालत निघायचे थोडे पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यावर झेंडा बुरुज लागतो तेथे झेंडा बुरुज उजवीकडे आणि वेताळ बुरुज डावीकडे असा फलक लावला आहे.ह्या किल्ल्यावर जागो जागी अवशेषांपुढे त्यांच्या नावाचे फलक लावले आहेत.झेंडा बुरुज पाहून सरळ चालत गेल्यावर तटबंदी आणि बुरुज लागतात त्यातील एका ठिकाणी छोटेखानी चोरदरवाजा दिसला ज्याला कमान होती.ह्या दरवाजातून खाली उतरल्यावर तटबंदीवरील बुरुजाच्या खाली पोहोचता येते फक्त जाताना हळुवार जावे अन्यथा खाली पडण्याचा धोका आहे.

                                                                  चोरदरवाजा  

                                                                              बुरुज                 
इथून पुढे सरळ गेल्यावर आपल्याला किल्ल्यावरील मोठा बुरुज लागतो ज्यावरून संपूर्ण आजूबाजूचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. बहुदा हा वेताळ बुरुज असावा.बुरुजाचा आवाका खूप मोठा आहे.पुढे सरळ गेल्यावर आपण जांभ्या दगडातल्या विहिरीजवळ पोहोचतो ह्या विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत ह्या विहिरीला साखर विहीर म्हणतात .ह्या विहिरीला लागूनच अंबामातेचे मंदिर लागते. साखर विहिरीला समांतर अशी सातकमान अथवा हनुमान विहीर आहे. (म्हणजे उजव्या बाजूला साखर विहीर तर डाव्या बाजूला सात कमान विहीर आहे) .सातकमान विहिरीत खाली पायऱ्यांनी  उतरता येते. हि विहीर स्थापत्यशास्त्राचा उत्तम  असा हा नमुना आहे.

                                                                          बुरुज

                                                                        साखर विहीर

                                                                सातकमान विहीर

                                                        सातकमान विहीर

                                                                    सातकमान विहीर 

हि विहीर पाहून आपण पुढे यायचे जिथे पुन्हा एक उत्तम अशी वास्तु आपली वाट पाहत असते ती म्हणजे अंधार कोठडी .साधारण २० ते २५ पायऱ्या उतरून एक कमान  लागते आणि डावीकडे उतरून पुन्हा थोड्या पायऱ्या लागल्यावर ह्या अंधारकोठडीची सुरुवात होते.खर तर ह्या अश्या ठिकाणी कैद्यांची काय हालत झाली असेल ह्याचा विचारच न केलेला बरा.ह्या अंधारकोठडीच्या बाजूला पण एक विहीर आहे.गडावर साखर विहिरीसारख्याच अन्य ३ विहिरी आहेत ज्या खरं तर गडाची शान आहेत.

अंधारकोठडी 

 अंधारकोठडीच्या पुढे नव्याने बांधलेले भवानी मातेचे मंदिर आहे आणि त्या पुढे छोटीशी बाग  केली आहे. किल्ल्याच्या खाली समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे  मंदिर आहे.अशाप्रकारे भवानी मातेचे मंदिर पाहिल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. सामानगडाच्या झेंडा बुरुज पासून तटबंदी लागत जांभ्या दगडात खांबांची उभारणी केली आहे पण त्यांचा उभारणी मागचा हेतू समजत नाही . 
सामानगडावरूनआमचे पुढचे ध्येय होते महिपाळगड.परंतु दुर्दैवाने हा किल्ला चक्क बस मधून न उतरता मी आम्ही सर्व ट्रेकर्स नि बघितला.कारण ह्या किल्यावर पूर्णतः वस्ती झाल्याने अवशेष जवळ जवळ नामशेष झाले आहेत जे काही बुरुज आणि थोडी तटबंदी दिसली तिथे बाजूला प्रसाधनगृहे  बांधली आहेत. दुर्दैव आणखी काय !!!!
महिलपालगडाचे लांबून दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो तेवढ्यात एक समाधान का होईना हेमाडपंती  धाटणीचे वैजनाथ मंदिर पाहायला मिळाले. मंदिराच्या प्रवेशदाराच्या विरुद्ध मोठा तलाव आहे. आणि मंदिरात प्रवेश केल्यावर पुरातन कुंड आहे ज्यात विविध चिन्हे कोरली आहे जसे नाग,कमलपुष्प इत्यादी.कुंड अत्यंत रेखीव आहे.मूळ मंदिर पण सुंदर आहे पण कलर लावल्याने सौन्दर्य निघून गेले आहे.मंदिरातली महादेवाची पिंड आणि पार्वती देवीची मूर्ती अत्यंत देखणी आहे.  पार्वती देवीची अशी मूर्ती फार काळाने मी पहिली. 


                                                                      वैजनाथ मंदिर  

                                                                      पुरातन कुंड  

                                                                           कुंड 

हेमाडपंथी खांब वैजनाथ मंदिर 



   

वैजनाथ मंदिर पाहून रात्री ८ च्या सुमारास आम्ही पारगड गाठला जिथे आमचा मुक्काम होता.पारगडावर पण थेट वरपर्यंत गाडी जाते परंतु तरीपण थोड्या पायऱ्या चढून गडमाथा गाठावा लागतो .पारगडावर पण वस्ती आहे पण गड  अगदी सुरेख रित्या गावकऱ्यांनी  सांभाळला आहे.अर्थात हे गावकरी म्हणजे मालुसरे घराणे , शेलारमामा तसेच पूर्वीचे गडकरी विठोजी माळवे ह्यांचे वंशज आहेत. महिपाळगडाच्या अगदी विरोधी चित्र येथे पाहायला मिळाले.गडावर नव्याने बांधलेले भवानी  मंदिर अगदी प्रशस्थ आहे.रात्री जेवून थोडी इतिहासाची माहिती घेऊन आम्ही झोपी गेलो.सकाळी बरोबर ७ वाजता पारगड पाहायला घेतला.मंदिर येण्याच्या आधी दोन कमानी आता बांधल्या आहेत त्यावर अनुक्रमे शिवाजी व संभाजी महाराजांच्या मुद्रा कोरल्या आहेत.इथून पुढे गेल्यावर २ घरे लागतात.घराच्या उजव्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.हा पुतळा गडावर शाळा बांधली आहे तिच्या पटांगणात आहे.सरळ उतरल्यावर तीन छोट्या तोफा ठेवल्या आहेत .त्याच्या उजव्या बाजूला नव्याने बांधलेले मारुती मंदिर आहे.     


                                                           महाराजांचा पुतळा पारगड

               
                                                                        तोफा
इथूनच मारुती मंदिराच्या उजव्या बाजूने गडाला फिरायला सुरुवात केली आणि गडाचे ताशीव कडे नजरेस आले.पुढे पुन्हा उजव्या बाजूला वळल्यावर तटबंदीच्या खुणा दिसू लागतात.तटबंदी पाहून पुन्हा उजव्या बाजूने गोल वळसा घालायला सुरुवात करावी म्हणजे आपण किल्ल्याला प्रदक्षिणा घालतो.सुरुवातीलाच डोळे दिपवणारा निशाण बुरुज आणि समोरील सुंदर असा परिसर लक्ष वेधतो.ह्या बुरुजावर भगवा फडकत होता.मनसोक्त फोटोग्राफी केल्यावर समोर मला कलानिधी गड  दिसला , जो त्यावर असणाऱ्या एम.टी.ऐन.ऐल च्या टॉवर वरून लगेच कळून येतो.

                                                                    तटबंदी  अवशेष

                                                                      निशाणी बुरुज

हे सर्व पाहून पुन्हा टोकवरून  उजवीकडे वळल्यावर  वाटेत महादेवाचे मंदिर आहे.आणि तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पहायला  मिळतात. सरळ पुढे गेल्यावर कुंपणे घातली आहेत ती पार करून आपण थेट भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस येतो.तिथे शूर सरदार विठोजी माळवे ह्यांच्या पत्नी तुळसा माळवे ह्यांचे स्मारक आहे.स्मारकात अतिशय सुंदर लहान वीरगळ ठेवले आहे. स्मारक पाहून भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या पायर्यांनी वर आलो तर तिथेही सुबक अशा आणि शेंदूर न फासलेल्या वीरगळी ठेवल्या आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत.भवानी मंदिरात येऊन मातेचे दर्शन घेतले , देवीची मूर्ती काळ्या पाषाणातली आहे
हा किल्ला पाहून मन प्रसन्न झाले. गावकऱ्यांनी किल्ला अतिशय प्रेमाने जपला आहे.त्यांच्या कार्याला सलाम!!!(क्रमशः)

                                                             तुळसा माळवे ह्यांचे स्मारक

 

                                                                               वीरगळ

                                                                     भवानी मंदिर

                            मंदिरा आधीच्या स्वराजाच्या पहिल्या दोन छत्रपतींच्या मुद्रा असलेल्या कमानी

गडांच्या इतिहासाबद्दल-

सामानगड-  हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा ह्याने बांधला . शिवरायांनी हा किल्ला सन १६६७ मध्ये स्वराज्यात आणला.ह्या किल्ल्याची किल्लेदारी अण्णाजी दत्तो ह्या अष्टप्रधानातील मुख्य असामी कडे होती.१६८८ मध्ये किल्ला मोगलांकडे गेला आणि तो परत १७०१ मध्ये मराठ्यांकडे आला.सन १८४४ मध्ये भूदरगडाप्रमाणे ह्या किल्ल्याने सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड केले ज्याचे नेतृत्व मुंजप्पा  कदम व इतरांनी केले.ह्या वेळेस इंग्रजांना दोनदा परतवून लावण्यात यश आले होते परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ ला किल्ला इंग्रजांनी घेतला व किल्ल्यावर येऊन तोफांनी किल्ल्याची प्रचंड नासधूस केली.असा हा किल्ला स्वराज्याच्या दृष्टीने मोक्याचा होता.

महिपाळगड-महिपाळगडाचा इतिहासात उल्लेख फारसा आढळत नाही.परंतु कोल्हापूर पट्ट्यातल्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा वापर केला गेला असावा. महिपाळगडाच्या पायथ्याला असलेले वैजनाथ मंदिर हे ११ व्या  शतकातले आहे. श्री गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे.आणि हे पुरातन अध्यात्मिक क्षेत्र आहे हे मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर लगेच जाणवते. 

पारगड- पारगड हा  १६७६ मध्ये शिवाजी राजांनी बांधला. ह्या गडाचा किल्लेदार तानाजी मालुसरे ह्यांचा मुलगा रायबा हा होता.ह्या किल्ल्याच्या गडप्रवेश आणि वास्तुशांती ला महाराजांचे वास्तव्य होते.१६८९ साली शहजादा मुअज्जम व खवासखान ह्याने वेढा दिलेला त्यावेळी लढताना तोफखान्याचे प्रमुख विठोजी साळवे ह्यांना वीरमरण आले.त्यांची समाधी गडावर बांधली आहे.ह्या गडावर किल्लेदाराचे वंशज स्वाभिमानाने कुठल्याही अनुदानाशिवाय गड सांभाळत आहे.

इतिहास सौजन्य – ट्रेक मध्ये दिली गेलेली माहिती व http://www.trekshitiz.com  हे संकेतस्थळ.  
                  

                                                                                                                                                                    
          

2 thoughts on “कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)

Leave a comment